Phoenix Maharashtra

विविध मागण्यांसाठी शिवसेनेने काढला मोर्चा

खामगांव : जिल्ह्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून तात्काळ जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा व यलो मोझॅक मुळे शेतकऱ्याचे झालेल्या नुकसानी बाबत हेक्टरी ५०००० रुपये मदत द्यावी सोबतच शेतमालाला हमीभाव देऊन मागील वर्षीचे अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ अदा करण्यात यावे. शासकिय शाळा महाविद्यालयाचे खाजगीकरण न करणे, शासकिय सेवेचे कंत्राटीकरण तात्काळ रद्द करावे. शहीद अग्नीवीर यांना शासकिय मानवंदना देण्यात यावी यासह विविध मागण्यासाठी आज शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाने उपविभागीय अधिकारी कार्यालय खामगाव येथे घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. बुलढाणा जिल्हयात असमतोल पावसामुळे पिकाची वाढ योग्य पध्दतीने झालेली नाही. तसेच सोयाबीन पिकावरील यलो मोझॅक रोगामुळे पिकाचे ८० टक्के नुकसान झाले आहे. त्याची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना हे. ५००००/- रु. शासकिय मदत देण्यात यावी. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यात यावा. शेतकरी हे अपार कष्ट करुन शेती पिकविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांच्या कष्टाची जाणीव म्हणून त्यांच्या पिकाला योग्य हमी भाव देण्यात यावा. मागील वर्षीची अतिवृष्टीची मदत अद्याप शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही ती तात्काळ देण्यात यावी. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी जगला तर आपण जगू शकतो याची जाणीव सर्वाना आहे. सोबतच सरकारी शाळा महाविद्यालयांचे खाजगीकरण, कंत्राटीकरण करण्यात येवू नये. यामुळे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे खूप मोठे नुकसान होणार आहे. खाजगीकरणामुळे शैक्षणिक धोरण पूर्णपणे बदलणार आहे. म्हणून हा निर्णय आपण रद्द करावा. शासकिय नोकर भरतीच करू नये कारण उमेदवार खूप मेहनत करून रात्रंदिवस अभ्यास करून शिक्षणासाठी मोठा आर्थिक खर्च करतात, त्यांना शासकिय सेवेची इच्छा असते. त्याच खूप मोठे नुकसान या तुघलकी निर्णयामुळे होणार आहे. हे आपल्या लक्षात आणून देत आहोत. उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय आपण रद्द करावा. जे उमेदवार भारतीय सैन्य दिलात अग्नीवीर म्हणून नोकरीस लागले आहेत ते शहीद झाल्यानंतर त्यांना शासकिय मानवंदना देण्यात येत नाही ही बाब लक्षात आले आहे. तरी शहीद अग्नीवीरांना शासकिय मानवंदना देण्याचा निर्णय घेण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी आज शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाच्या वतीने करण्यात आले होते. जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल व याला सर्व जबाबदार सरकार राहील याची नोंद घ्यावी असा गंभीर इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला आहे. यावेळी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे नरेंद्रदादा खेडकर, दत्तात्रय पाटील, वसंतराव भोजने, डॉ. संतोष तायडे, विजय बोदडे, देविदास उमाळे, रवि महाले, विजय इंगळे, सौ. श्रुती पंत, श्रीराम खेलदार, शैलजा ताई ठाकरे, सुरेश लोखंडे यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version