Phoenix Maharashtra

शेतकऱ्यांना सलोखा योजनेतून मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क माफी ; नाममात्र एक हजारात होणार दस्तनोंदणी

बुलडाणा (जिमाका) : शेतजमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यातील आपसातील वाद मिटविण्यासाठी शासनाव्दारे सलोखा योजना राबविण्यात येत आहे. परस्परांमधील शेतजमिनीचा ताबा परत मुळ मालकाकडे करण्यासाठी आता सलोखा योजनेतून नाममात्र एक हजार रूपयांत दस्त नोंदणी होणार आहे. शेतजमिनीच्या वहिवाटीवरून होणारे वाद वाढत आहे. यावर उपाययोजना म्हणून हे वाद मिटविणे आणि समाजात सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी ही योजना प्रभावी ठरणार आहे. यामुळे एकमेकांमधील सौख्य आणि सौहार्द वाढीस लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे किंवा दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमिनधारकांचे अदालाबदल दस्तांसाठी नोंदणी शुल्क एक हजार रूपये नाममात्र आकारण्याबाबत सवलत देण्याची सलोखा योजना शासन निर्णय 3 जानेवारी 2023 पासून राबविण्यात येत आहे. सदर योजना अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षांपर्यंत लागू राहणार आहे. एकाच गावात जमिन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांचे परस्परांकडे मालकी आणि ताबा असल्याबाबतचा पंचनामा मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी करुन दस्त नोंदणीच्या वेळी दस्तासोबत जोडणे बंधनकारक आहे. जमिनीच्या दोन्ही बाजूकडील क्षेत्रफळात कितीही फरक असला तरी योजनेत पात्र मात्र दोन्ही पक्षकार सर्व संमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवित असल्याची अट दस्तामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. या योजनेमुळे आपसातील पिढीजात वैरभावना संपुष्टात येऊन ताबा आणि मालकीबाबतचा संभ्रम नष्ट झाल्यामुळे सकारात्मक मानसिकता होऊन जमिनीच्या विकासाला चालना मिळणार आहे. तसेच शेतकऱ्याचे वैयक्तिक आणि राष्ट्रीय उत्पादनात वाढ होऊन न्यायालयांमध्ये प्रलंबित दावे निकाली निघून शेतकरी, न्यायालय आणि प्रशासनाचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. सलोखा योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची असल्यामुळे योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन वाद मिटवून सामाजिक सौख्य आणि सौहार्द वाढविण्यास हातभार लावावा, योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी महसूल करण्यात आले आहे.

Exit mobile version